प्रभाग क्रमांक ८ मध्ये माजी नगरसेवकांच्या टक्केवारी संस्कृतीला आणि कथित खंडणीखोरीला जनता कंटाळली
इंद्रायणीनगर-बालाजीनगर प्रभागातील जनतेत संताप उसळल्याने धनुष्यबाणाचा होतोय कडकडाट!

वर्षानुवर्षे विकासाच्या नावाखाली चाललेले व्यवहार, कामांशिवाय वाढलेली संपत्ती, प्रत्येक परवानगीमागे टक्केवारीचा संशय या सगळ्याला आता प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिक वैतागले आहेत. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असताना माजी नगरसेवकांचे “कमिशनचे गणित मात्र अचूक” असल्याची भावना प्रभागातील जनतेत खोलवर रुजली आहे. याच असंतोषातून धनुष्यबाण हा बदलाचा आणि स्वच्छ कारभाराचा प्रतीक म्हणून पुढे येत आहे. धनुष्यबाण चिन्हावर लढणारे महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके हे दोघेही सर्वसामान्यांचा आवाज बनून पुढे आले असून, त्यांना जनतेतून भरघोस पाठिंबा मिळताना दिसत आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील घराघरांत, चहाच्या टपऱ्यांवर, सोसायट्यांच्या बैठकीत एकच चर्चा असून “यावेळी दलालशाही नको, थेट काम हवं!”, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील काळात प्रभागात काम सुरू होण्याआधीच टक्केवारीची चर्चा रंगायची. परिणामी प्रभागाचा विकास आजपर्यंत रखडला असून सामान्य माणूस भरडला जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रभागाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवकांबाबत जनतेमध्ये असंतोष स्पष्ट दिसत आहे. दुसरा पर्याय म्हणून धनुष्यबाणावर विश्वास हा या प्रभागातील नागरिकांकडून केवळ राजकीय निवड नाही, तर नैतिक निर्णय बनत चालला आहे.
या प्रभागातील प्रचारातही फरक ठळक दिसत आहे. धनुष्यबाणाच्या बाजूने थेट संवाद, प्रश्नांना स्पष्ट उत्तरे आणि पारदर्शकतेची भाषा ऐकायला मिळते, तर विरोधी पॅनेलमधील माजी नगरसेवकांकडे जुन्या सवयींचे ओझे आणि स्पष्टीकरणांची धडपड दिसत आहे. त्यामुळे जनतेचा कौल दिवसेंदिवस धनुष्यबाणावर अधिक ठाम होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये हवा बदलली आहे. माजी नगरसेवकांच्या टक्केवारी संस्कृतीला आणि कथित खंडणीखोरीला कंटाळलेली जनता आता धनुष्यबाणाच्या जोरावर स्वच्छ, निर्भीड आणि काम करणाऱ्या नेतृत्वाकडे वळली आहे. ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नाही, तर गलिच्छ राजकारणाला धडा शिकवण्याची ठरू लागली आहे आणि त्याचा आवाज म्हणून महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके या दोन उमेदवारांचा आवाज आज संपूर्ण प्रभागात घुमताना दिसत आहे.



