प्रभाग क्रमांक १२, त्रिवेणीनगरमध्ये मशालचा भडका!
अमोल भालेकरांचा प्रचार म्हणजे अपयशी सत्ताधाऱ्यांवर थेट तोफगोळे

त्रिवेणीगरमधील खड्ड्यांचे रस्ते, कायमची पाणीटंचाई, उघडी ड्रेनेज, कचऱ्याचे साम्राज्य आणि असुरक्षित परिसर या सगळ्या प्रश्नांकडे बोट दाखवत अमोल भालेकर यांनी थेट सवाल केला आहे. “इतकी वर्षे सत्ता भोगली, नगरसेवकपद उपभोगले, मग रुपीनगरला काय दिलंत?” हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकाच्या तोंडून ऐकू येत असून, आतापर्यंत झालेले नगरसेवक व विरोधी उमेदवार मात्र उत्तर द्यायला पळ काढताना दिसत आहेत. “निवडणूक आली की गोड गोड बोलायचं, आणि मतं मिळताच गायब व्हायचं हा फसवा राजकारणाचा खेळ आता संपला आहे,” असा घणाघाती हल्ला करत अमोल भालेकर यांनी आतापर्यंत झालेल्या नगरसेवकांचे अपयश, भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा हिशोब जनतेसमोर मांडला. मशाल हे केवळ चिन्ह नसून, त्रिवेणीनगरच्या प्रश्नांवर टाकलेला प्रकाश आहे, असा ठाम संदेश त्यांनी प्रचारात दिला.
अमोल भालेकर यांचे त्रिवेणीनगरमध्ये घरोघरी जोरदार स्वागत करण्यात आले. घरोघरी महिलांनी अमोल भालेकर यांचे औक्षण केले. त्यांच्या विजयासाठी देवाकडे प्रार्थना करताना महिला दिसत होत्या. त्यामुळे अमोल भालेकर यांच्या विजयासाठी या प्रभागातील महिलांनीच वज्रमूठ बांधली असल्याचे पाहायला मिळत आहे. मशालच्या विजयासाठी प्रभाग क्रमांक १२ मधील महिलांची झालेली ही एकजूट अमोल भालेकर हे या प्रभागातील इतर उमेदवारांपेक्षा किती सरस उमेदवार आहेत याची साक्ष देणारी ठरत आहे.
मशाल चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले अमोल भालेकर यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये उत्साहाची लाट उसळली असून, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. गल्लीगल्लीत एकच चर्चा सुरू असून, “या अंधाराला मशालच लागते!”, अशी भावना या प्रभागातील मतदार व्यक्त करत आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये यावेळी निवडणूक म्हणजे केवळ मतदान नाही, तर अपयशी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याची जनतेची संधी ठरणार आहे. पेटलेली ही मशाल आता प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय भूकंप घडवणार, यात शंका नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.



